Skip to main content

प्रश्न मराठवाड्याच्या विकासाचा.....!

marathiinfo.1@daherenkoji.blogger.comअनेक दशके निजामाच्या राजवटीत घालवलेला मराठवाडा आजही " त्या " गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेला नाही.बंदिस्त घरट्यातील पक्षी आकाशात झेप घेण्याचं विसरुन जातो तद्वत गुलामीच्या शृंखलांतून मुक्त होऊनसुद्धा विकासात्मक समाज रचनेकडे आम्ही झेप घेऊ शकलो नाही.किंबहुना राष्ट्रीय पातळीपर्यंत दबदबा असलेल्या मराठवाड्याच्या सुपुत्रांनीही राजकीय महत्वाकांक्षा जोपासतांना समाजबांधणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे जाणवत नाही.त्याचप्रमाणे समाजकार्य करणारे समाजधुरीणांना ही या दिशेने फार काही करता आले असे म्हणणे धाडसाचेच होईल.
वेगळे राज्य करुन जनतेच्या पदरी काय पडणार?याचाही विचार होणे गरजेचे आहे.राज्य चालवायचे तर मराठवाड्याचे  महसूली उत्पन्न किती?निधी कसा उभा करणार?केंद्र सरकारच्याच मेहरबानीवर अवलंबून रहायचे तर केंद्रिय नेतृत्वाच्या विचाराचे सरकार चालवणारे आणि त्याच्याशी जवळीक असणारे नेतृत्व हवे!
 "वेगळं व्हायचंय मला " यामागच्या रेट्याची आणि ताकदीची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळयांना जाणीव आहे.त्याकडे किती गांभिर्यानं पहायचं हे ते चांगले ओळखून आहेत.
वेगळं होण्याची डरकाळी नसून केवळ आवई असते.एखाद्या वर्तमानपत्राचा काॅलम सजवणे किंवा इलेक्ट्राॅनिक माध्यमाची ब्रेकिंग  यापलिकडे त्याला फार काही किंमत असत नाही.
या सगळ्या खटाटोपातून आपलं अस्तित्व दाखविण्यापेक्षा इथल्या नवतरुणाईच्या मनात विकासाची स्वप्नं रुजवलीत तर तेच अधिक उपयुक्त होऊ शकेल.एकदा का इथल्या तरुण पिढीला नेमका विकास काय असतो तो कसा साधायचा का ओढून आणायचा हे पक्कं समजलं की आमच्यावरील मागासलेपणाचा डाग निश्चितपणानं धुतला जाईल....

Comments